नवी मुंबई: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आता भूमिपुत्र आरपारच्या लढ्याच्या तयारीत आहेत. याच मुख्य मागणीसाठी आणि भूमिपुत्रांच्या न्याय्य हक्कासाठी आमच्या धडाडीच्या भगिनी रश्मीता ताई या आमरण उपोषणाला बसल्या आहेत. प्रकृतीची पर्वा न करता, आपल्या समाजाच्या अस्मितेसाठी रश्मीता ताईंनी सुरू केलेल्या या आंदोलनाला आता संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड पाठिंबा मिळत आहे.
या संवेदनशील प्रसंगी आगरी सेना प्रमुख आदरणीय प्रदीपजी राजाराम साळवी साहेब यांनी उपोषणस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन रश्मीता ताईंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे. एवढंच नाही तर, विमानतळाला दिबांचं नाव लागेपर्यंत आगरी सेना शांत बसणार नाही, अशी भविष्यातील अत्यंत आक्रमक भूमिकाही साळवी साहेबांनी यावेळी स्पष्ट केली.
८ जुलैला रस्ते चक्काजाम होणारच! आंदोलकांनी सरकारला थेट इशारा दिला आहे की, ९४ गावांतील प्रकल्पबाधित, शेतकरी, कष्टकरी आणि आगरी-कोळी समाज ८ जुलैला मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्र एकत्र येणार असून विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. “सरकारने कितीही गुन्हे दाखल केले किंवा दडपशाही केली, तरी आम्ही थांबणार नाही. रस्ते चक्काजाम झाल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही,” अशी संतप्त आणि ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. ही लढाई अस्मितेची असून दिबांचे नाव विमानतळाला लागल्याशिवाय आता भूमिपुत्र माघार घेणार नाहीत, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



























