नित्यम न्यूज (ठाणे): राज्यात ४ मे पासून रिक्षा चालकांनी पुकारलेल्या संपावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून ‘१५ लाख रिक्षावाले संपावर जाणार’ अशी चर्चा सर्वत्र रंगली असताना, मनसे नेते अविनाश जाधव यांनी अधिकृत आकडेवारीनिशी या दाव्याचा पर्दाफाश केला आहे. जाधव यांच्या मते, प्रत्यक्षात मुंबई, ठाणे आणि रायगड या महत्त्वाच्या शहरांमध्ये केवळ ४ लाख १७ हजार ४८४ रिक्षा आहेत, मग १५ लाखांचा आकडा आला कुठून? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
या संपाच्या आडून फेक माहिती पसरवली जात असल्याचा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, या क्षेत्रातील ६० ते ६५ टक्के चालक हे मराठी भूमिपुत्र आहेत. “जर कोणी महाराष्ट्राला चॅलेंज करण्याचा प्रयत्न केला किंवा प्रवाशांना वेठीस धरले, तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल. आम्ही आमच्या गाड्या रस्त्यावर काढू,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. संपाच्या नावाखाली भीती निर्माण करणाऱ्या परप्रांतीय चालकांना त्यांनी ‘परत जा’ असा सज्जड दम भरल्याने आता या संपाच्या नियोजनाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

✍🏻मुख्य संपादक – सौ.स्नेहा गितेश पाटील



























