इताडे नगरीत वै. ह.भ.प. नरेश महाराज पाटील यांचा ५ वा पुण्यस्मरण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न
भिवंडी (प्रतिनिधी): प.पु. गुरुवर्य वै. ह.भ.प. केशव महाराज (बापूसाहेब) कबीर, आळंदी देवाची यांचे पट्टशिष्य वै. ह.भ.प. नरेश महाराज पाटील यांचा पाचवा पुण्यस्मरण सोहळा मंगळवार, दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी इताडे (भिवंडी) येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा झाला. या निमित्ताने आयोजित धार्मिक कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळींसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लक्षणीय होती.
ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर यांची रंगली कीर्तन सेवा सोहळ्याच्या मुख्य कार्यक्रमात सायंकाळी ४:३० ते ६:३० या वेळेत गुरुवर्य ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर (विश्वस्त, श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज मंदिर समिती, आळंदी देवाची) यांची सुश्राव्य कीर्तन सेवा संपन्न झाली. आपल्या रसाळ वाणीतून महाराजांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या प्रसंगी वारकरी संप्रदाय आमने-लोणाड परिसराचे अध्यक्ष ह.भ.प. श्री. जनार्दन महाराज पाटील, आगरिसेना उल्हासनगर तालुका अध्यक्ष मा. श्री. जितेंद्रजी जोशी साहेब आणि अष्टविनायक फाउंडेशनचे संस्थापक मा. श्री. नितीनजी कडू साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. या मान्यवरांसह परिसरातील इतर वरिष्ठ मंडळींनी उपस्थित राहून वै. नरेश महाराजांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन केले.
भजन सेवेने वातावरण झाले विठ्ठलमय भक्तीचा जागर सुरू ठेवत रात्री ९ वाजता ‘जय गणेश प्रासादिक भजन मंडळ’ (कुलवंतनगर, शहापूर) यांच्या वतीने भजन सेवा सादर करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध गायक विठ्ठलबुवा वरकुटे व त्यांच्या संचाने पहाडी आवाजात भजने सादर केली. त्यांना धनंजय घरत यांनी पखवाजवर तर दर्शन पवार यांनी तबल्यावर उत्तम साथ दिली. या भजनांनी संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाला होता.
भाविकांची मोठी उपस्थिती आणि महाप्रसाद या पुण्यस्मरण सोहळ्यासाठी इताडे गावातील आणि पंचक्रोशीतील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला.
वृत्त संकलन: नित्यम न्यूज, भिवंडी.

✍🏻मुख्य संपादक – सौ.स्नेहा गितेश पाटील



























