नवी मुंबई / उरण:
नवी मुंबईच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या एका खळबळजनक जमीन व्यवहाराने मोठी खळबळ उडवून दिली आहे. नाशिकचा कथित ‘भोंदू’ अशोक खरात याच्या नावे उरण परिसरातील चांजे गावालगत कोट्यवधी रुपयांची जमीन सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, हा व्यवहार केवळ जमिनीची खरेदी-विक्री नसून त्यामागे नवी मुंबई महानगरपालिकेतील एका बड्या अधिकाऱ्याचा ‘वरदहस्त’ असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगत आहे. ‘तिसरी मुंबई’ आणि विमानतळ प्रकल्पामुळे सोन्याचा भाव आलेल्या या परिसरात, सर्व नियम धाब्यावर बसवून हा व्यवहार पूर्ण करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उरणमधील चांजे शिवारातील ही जमीन कोणत्या नियमांतर्गत आणि कुणाच्या मध्यस्थीने खरातच्या पदरात पडली, याबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. स्थानिक जागरूक नागरिक आणि राजकीय नेत्यांनी आता या प्रकरणावर थेट बोट ठेवले असून, या व्यवहारामागे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा आणि भ्रष्टाचार दडल्याचा आरोप केला आहे. एका बाजूला सर्वसामान्य माणसाला घरासाठी आणि जमिनीसाठी संघर्ष करावा लागत असताना, दुसऱ्या बाजूला गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना प्रशासकीय आशीर्वादाने जमिनी कशा मिळतात, असा संतप्त सवाल विचारला जात आहे. या प्रकरणाची आता सखोल चौकशी (SIT) होऊन यामागचे ‘मास्टरमाइंड’ समोर येणे गरजेचे आहे, अन्यथा संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील.

✍🏻मुख्य संपादक – सौ.स्नेहा गितेश पाटील



























